म्हणतात ना ‘बोलणाऱ्याची माती विकली जाते पण न बोलणाऱ्याची सोनेही विकले जात नाही’. असंच जर आपल्या ओठांवर नेहमी गोड शब्द आणि डोक्यात शांतता असेल तर कोणीच आपल्याला हरवू शकत नाही. असेच एक आहेत हे अन्सार चाचा. ज्यांचे वडापावचे छोटेसे दुकान आहे परंतु जर त्यांचे ग्राहक पाहिले तर तुम्हाला आश्चर्य होईल. गिऱ्हार्ईकांची वडापाव घेण्यासाठी मोठी रांग लागते.
जिथे चविष्ट आणि परवडणारे असे पदार्थ मिळतात, लोक तिथे आकर्षिले जातात. तसेच हे अन्सार चाचा आहेत जे एकदम स्वादिष्ट असा वडापाव विकतात. हा वडापाव घेण्यासाठी लोक दुरून दुरून येतात आणि गरम गरम वडापाव खाण्याचा आनंद घेतात. तुम्ही व्हिडीओ मध्ये पाहिले तर तुम्हाला समजेल की, अन्सार चाचा चा स्वभाव आणि त्यांचे वडापाव दोन्हीही उत्तम आहेत.
चाचा हे सर्वांशी हसून आणि प्रेमळ शब्दाने बोलतात. या दुकानात विशेष म्हणजे महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असते. चाचा याची खबरदारी सुद्धा घेतात की, महिलांच्या रांगेत पुरुष उभा राहणार नाही. ‘खाता की नेता, चटक्याला समुद्राचा झटका(म्हणजेच तळलेल्या मिर्चीला मीठ लावणे), एक पिता की दोन पिता, माय बाप, प्रचंड वेगाने’ असे अनेक मजेशीर वाक्य ते ग्राहकांना वडापाव देताना वापरतात.
हे अन्सार चाचाचे वडापावचे दुकान संगमनेर तालुक्यातील समानापूर येथे आहे. अहमदनगर आणि नाशिक महामार्गावरील येणारे जाणारे इथे थांबून वडापावचा आनंद घेतात. १९७८ पासून अन्सार चाचा हे दुकान चालवत आहेत. हा वडापाव आणि चाचा चे शब्द हे खुपच आनंद देतात. मला तर असे वाटते की, काही लोक खास त्यांचे हे बोलणे ऐकण्यासाठी पण तिथे येत असतील.
व्हिडिओमध्ये पाहाल तर असे दिसतेय की या दुकानात नेहमीच ग्राहक असतो आणि तोही एकाचवेळी १०-१२ वडापाव विकत घेतो. म्हणजेच इथला वडापाव बराच प्रसिद्ध आहे. तुम्हीही असे वडापाव खाण्यासाठी नेहमी आतुरच असाल आणि त्यात एवढा स्वादिष्ट वडापाव असेल तर कोण नको बोलेल? कधी संगमनेरच्या बाजूला तुम्ही जाल तर अन्सार चाचाला नक्की भेट द्या आणि त्यांच्या बोलण्याचा आणि वडापाव या दोन्हीचा लाभ घ्या.
पहा व्हिडीओ: